श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी
आज अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे. श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा अवतार मानला जातो. श्री स्वामी समर्थ म्हणजे बुद्धिगम्य आहेत, अद्भुत आहेत. चंचल असणाऱ्या व्यक्तीला स्वामींचा स्वरूप आणि त्यांची विलक्षण कृपा सत्ता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार करणार नाहीत व अनुभवासही येणार नाहीत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहे. परमहंस आहेत. स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत, अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम आणि रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर म्हणजेच अकार म्हणजेच शेषशाही विष्णु भगवान आहेत. सर्व विश्वातील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप आहेत. स्वामी सर्व जीवातील प्राण आणि तेज आहेत. स्वामी नित्य जागृत, म्हणजेच स्वामींची सर्व देवस्थान स्वामींच्या अस्तित्वाने जागृत आहेत.
श्री स्वामी समर्थ महाराज हे अतिसुक्ष्म व अति विराट वटवृक्षासारखे, वटवृक्षाच्या तळी व मुळात आहेत. स्वामी आपल्या परमभक्तांच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात. प्रारब्धाने कितीही दुःख किंवा संकट आली तरी भक्तांची भगवंताच्या चरणावर अढळ श्रद्धा आहे का नाही, ते स्वामी पाहतात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेने स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही. श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली नेहमी बसत असत. याच वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ शके १८०० चैत्र वैद्य त्रयोदशीच्या दिवशी दुपारी तीन साडेतीनचे सुमारास लौकिक दृष्ट्या देहाने पंचत्वात विलीन झाले. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” आणि “जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो” या वचनांची असंख्य भक्तांना आलेली अनुभूती त्यांच्या कृपाशीर्वादाची, अस्तित्वाची खूण सतत देत असते.
आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वती हे श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तिथे ते तपश्चर्येला बसले. मधे साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झालं. एके दिवशी एक लाकूडतोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्याच वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. कुऱ्हाडेचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्री स्वामी समर्थ तिथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले. तिथून गंगा काठाने कलकत्ता, नंतर जगन्नाथ पुरी या मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे इथे प्रकट झाले. ते रानामध्ये वास्तव्य करत. मंगळवेढे इथल्या वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून अक्कलकोट येथे आले. श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या एकूण प्रकट वास्तव्यातील ४० वर्षांपैकी २१ वर्ष अक्कलकोट येथे व्यतीत केली. चैत्र कृष्ण त्रयोदशी शके १८०० मध्ये त्यांनी वडाखाली देहत्याग केला आणि ते निजानंदी निमग्न झाले. अवतार समाप्तीचे आधी आठ दिवस त्यांनी अखंड नाम भजन सुरू ठेवलं. देह प्रकृतीही नाशवंत असल्याने पुढे त्यांना ज्वर भरला. त्यांनी अन्न त्यागही केला. भक्तांची समजूत घालून श्री स्वामी समर्थांनी त्यांना दुःखी कष्टी होऊ नका असं सांगितलं आणि गीतेतील श्लोकाचा उच्चार केला,
“अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।”
‘अनन्य भावाने शरण जाऊन जो माझी भक्ती करतो, नामस्मरणातून भक्तीयोग आचरितो त्याचा योगक्षेम मी चालवीन’, असे अभिवचन श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या भक्तांना दिले. हा श्लोक म्हणत त्यांनी ध्यानमग्न अवस्थेतच निर्वाण केले.