हरिपाठ अभंग
वारकरी संप्रदायामधला साधनेचा महत्त्वाचा भाग म्हणजे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या हरिपाठाचे नित्यपठण करणे. हरिपाठासारखी अन्य सोपी साधना नाही. हरिपाठामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामाचे महिमान गायले आहे. भगवन्नाम हे कलियुगातील सर्वश्रेष्ठ आणि एकमेव साधन आहे. नाम हेच साध्य आणि साधनही आहे.
कुठलीही परमार्थिक गोष्ट परमेश्वराच्या अधिष्ठानाशिवाय पूर्णत्वाला जात नाही. परमार्थाची वाटचाल करत असताना ‘त्या भगवंताचे प्रेम मला मिळावे’ ही साधकाची भावना असते. तो परमेश्वर नित्य आपल्याजवळ आहे ही भावना हृदयात पक्की रुजली की भक्त निर्भय होऊन त्याच्यातील न्यूनगंड नाश पावतो आणि भक्तिरस ओसंडून वाहतो.
हरिपाठाचे नित्य पठण करताना साधक तल्लीन होऊन जातो आणि या अभंगांना संगीताची जोड असल्यास साधकाच्या मन:पटलावर आणि बुद्धिपटलावर त्या नामसंकीर्तनाचे महत्त्व आणखीनच दृढ होत जाते. हरिपाठाच्या अभंगांना आजवर पारंपरिक पद्धतीने अथवा सुगम पद्धतीने तसेच शास्त्रीय संगीताच्या पद्धतीने देखील अनेकांनी स्वरसाज चढवला आहे. संगीतकार स्वर्गीय श्री. मनोहर तथा दादा सबनीस यांनी अभिजात शास्त्रीय संगीतातील अनेक रागांचा वापर करून ह्या अभंगांना स्वरसाज चढवला आहे. त्यात प्रचलित रागांबरोबरच अनवट रागांचाही त्यांनी अतिशय सुंदर वापर केला आहे. त्यांच्या शिष्या श्रीमती अलका गोगटे यांनी या चालींचे जतन करून त्यांच्या शिष्यांनाही हे शब्द-स्वर-धन सुपूर्द केले आहे. श्रीमती अलका गोगटे यांच्या शिष्या सौ. मुग्धा बापट यांनी या हरीपाठाच्या अभंगांचे गायन केले आहे.
सहगायक : सौ.विदुला संत, सौ.स्वरदा देशपांडे, सौ.मृणालिनी वझे
संवादिनी : सौ.भाग्यश्री केसकर
तबला : सौ.भावना टिकले
ध्वनिमुद्रण : ओरायन स्टुडिओज, पुणे