वक्रतुण्ड
वक्रतुण्डावतारश्च देहानां ब्रह्मधारकः ।
मत्सरासुरहन्ता स सिंहवाहनगः स्मृतः ॥
भगवान श्रीगणेशाचा ‘वक्रतुण्डावतार’ ब्रह्मरूपाने संपूर्ण शरीरांना धारण करणारा, मत्सरासुराचा वध करणारा तसेच सिंहासनावर आरूढ होणारा आहे. मुगल पुराणानुसार भगवान गणेशांचे अनेक अवतार आहेत, ज्यात आठ अवतार प्रमुख आहेत. प्रथम अवतार वक्रतुण्डाचा आहे. अशी कथा आहे. की, देवराज इंद्राच्या प्रमादामुळे मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यापासून भगवान शिवाचा पंचाक्षरी मंत्र ( ॐ नमः शिवाय) याची दीक्षा प्राप्त करून भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला अभय होण्याचे वरदान दिले.
वरदान प्राप्त करून जेव्हा मत्सरासुर घरी परतला तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला दैत्यांचा राजा केले. दैत्य मंत्र्यांनी शक्तिशाली मत्सरासुराला विश्वविजय करण्याचा सल्ला दिला. शक्ती आणि पदाच्या मदाने चूर झालेल्या मत्सरासुराने आपली विशाल सेना घेऊन पृथ्वीवरील राजेलोकांवर आक्रमण केले. कोणताही राजा या महान असुरासमोर टिकू शकला नाही. काहीजणांनी पराजय स्वीकारला आणि काहीजण आपले प्राण वाचवून पर्वतांच्या गुहेमध्ये जाऊन लपले. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीवर मत्सरासुराचे शासन कायम झाले. पृथ्वीला आपल्या अधीन करून त्या महान पराक्रमी दैत्याने क्रमाने पाताळ आणि स्वर्गांवरसुद्धा चढाई केली. शेषाने विनयपूर्वक त्याच्या अधीन राहून त्याला करभार देणे स्वीकार केले. वरुण, कुबेर, यम इत्यादी समस्त त्याच्याद्वारे पराजित होऊन पळून गेले. इंद्रसुद्धा त्याच्यापुढे टिकू शकला नाही. मत्सरासुर स्वर्गाचासुद्धा सम्राट बनला.
असुरांच्या भीतीने दुःखी झालेल्या देवता ब्रह्मदेव आणि विष्णूंना बरोबर घेऊन कैलासाला पोहोचल्या. त्यांनी भगवान शंकरांना दैत्यांच्या अत्याचाराचा संपूर्ण समाचार सांगितला, भगवान शंकरांनी मत्सरासुराच्या अशा दुष्कर्माची भयंकर निंदा केली. हा समाचार ऐकून मत्सरासुराने कैलासावरसुद्धा बढ़ाई केली. भगवान शंकरांबरोबर त्याचे भयंकर युद्ध झाले. परंतु त्रिपुरारी भगवान शिवसुद्धा त्याच्यासमोर टिकाव धरू शकले नाहीत. त्याने शंकरांनासुद्धा कठोर पाशात बांधले आणि कैलासाचा मालक होऊन तो तेथेच राहू लागला. चहूकडे दैत्यांचा अत्याचार होऊ लागला.
दुःखी देवतांजवळ मत्सरासुराच्या विनाशाचा कोणताही उपाय राहिला नाही. ते अत्यंत चिंतातुर आणि बलहीन झाले होते. त्याचवेळी तेथे भगवान दत्तात्रेय आले. त्यांनी देवतांना वक्रतुण्डाच्या एकाक्षरी मंत्राचा (गं) चा उपदेश केला. समस्त देवता भगवान वक्रतुण्डाच्या ध्यानाबरोबर त्या एकाक्षरी मंत्राचा जप करू लागले. त्यांच्या आराधनेने संतुष्ट होऊन फलदाते वक्रतुण्ड तत्काल प्रगट झाले. ते देवतांना म्हणाले-‘तुम्ही लोक निश्चिंत व्हा. मी मत्सरासुराच्या गवला चूर-चूर करून टाकीन.’
भगवान वक्रतुण्डांनी आपल्या असंख्य गणांसह मत्सरासुराच्या नगराला चहूकडून वेढा दिला. दोघामध्ये भयंकर युद्ध झाले. पाच दिवस एकसारखे युद्ध चालू राहिले. मत्सरासुराचे सुंदप्रिय आणि विषयप्रिय नावाचे दोन पुत्र होते. वक्रतुण्डाच्या दोन गणांनी त्यांना ठार केले. पुत्रवधाने व्याकूळ झालेला मत्सरासुर रणभूमीत उपस्थित झाला. त्याने त्यावेळी भगवान वक्रतुण्डांना उद्देशून अनेक अपशब्द उच्चारले. भगवान वक्रतुण्डांनी प्रभावपूर्ण स्वरात उत्तर दिले- ‘जर तुला स्वतःचे प्राण प्रिय असतील तर शस्त्र खाली ठेवून मला शरण ये नाही तर माझ्या हातून तू निश्चित मारला जाशील.’
वक्रतुण्ड यांच्या भयानक रूपाला पाहून मत्सरासुर अत्यंत व्याकूळ झाला. त्याची सर्वशक्ती क्षीण झाली. भीतीमुळे तो थरथर कापू लागला. तसेच विनयाने वक्रतुण्ड यांची स्तुती करू लागला. त्याच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन दयासागर वक्रतुण्डांनी त्याला अभय प्रदान करून स्वतःच्या भक्तीचे वरदान दिले. तसेच जीवनकाल शांतिपूर्वक चालविण्यासाठी त्याला पाताळात जाण्याचा आदेश दिला. मत्सरासुरापासून निश्चिंत होऊन देवगण वक्रतुण्ड यांची स्तुती करू लागले. देवतांना स्वातंत्र्य मिळवून देऊन प्रभु वक्रतुण्डांनी देवतांनासुद्धा आपली भक्ती प्रदान केली.